छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारलेले हे लोक, सीएए आणि एनआरसीच्या आडून पुन्हा एकदा या देशात चातुर्वर्ण्य व्यवस्था आणू इच्छितात : बाळासाहेब थोरात

सीएए आणि एनआरसीच्या आडून काही विशिष्ट लोक हे चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा एकदा या देशात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केला. काँग्रेसच्या वतीने अमरावतीत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नागरिकत्त्व सुधारणा विधेयकावरून भाजपवर कडक शब्दात टीका केली. “आज अनेक गरीब भटक्या लोकांकडे रहिवासी पुरावे नाहीत. मग त्यांनी भारतीय असल्याचे सिद्ध कसे करावे. मग अशा लोकांना हे सरकार विदेशी ठरवतील. यात केवळ विशिष्ट धर्माचे लोक नाही, तर तुम्ही आम्हीदेखील असू म्हणून यासाठी या कायद्याविरोधात सर्वांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ही बाळासाहेब थोरात यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच मंडळींनी नाकारला होता. त्यामुळे हे लोक लोकशाही आणि राज्यघटना याविरोधात असल्याचे आपण लक्षात घेतल पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच , भाजप सारख्या अश्या लाटा किती येतील आणि किती जातील मात्र, यात केवळ काँग्रेस आणि राज्यघटना टिकेल, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी एनआरसीच्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापले असून जनमत हे एनआरसीच्या विरोधात आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातच मतभेद असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केलाय.