भारतात राहणारे सर्व हिंदूच, मोहन भागवतांचा पुन्हा हिंदुत्वाचा जयजयकार
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा या देशातील १३० कोटी लोक हिंदूच असल्याचे म्हटले आहे. हैदराबाद येथे आयोजित संघाच्या तीन दिवसीय विजय संकल्प शिबीरॅत त्यांनी हे प्रतिपादन केले. या शिबिरासाठी आंध्रप्रदेश आणि तेलंगणातून हजारो स्वयंसेवक हैदराबाद येथे बोलावण्यात आले होते. त्यावेळी समारोप कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हिंदुत्वाचा पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जयजयकार केला.
यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, या देशात राहणारे सर्व १३० कोटी लोक हे हिंदुच आहे. हिंदू याचा अर्थ अतिशय व्यापक आहे. तो संकुचित नाही. जो व्यक्ती कुठल्याही पूजा पद्धतीचा अंगिकार करत असो, पण तो या देशाला मातृभूमी मानतो, जन, जल, जंगल, जमीन आणि जानावरांना श्रद्धास्थानी मानतो ते सगळे हिंदुच आहेत असे आम्ही मानतो.
हिंदू आणि मुस्लिमांमधली भांडणं मिटवण्यासाठी गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी एक उपाय सांगितला होता. तो उपाय म्हणजे हिंदू उपाय आहे. संघ हा विविधतेचा स्वीकार करणारा आहे. विविधतेतून एकता म्हणजेच हिंदुत्व आहे. इथले नागरिक आपापल्या पूजा पद्धतीचा स्वीकार करून त्याचं पालन करूनही सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याचं काम हे हिंदुत्व करते असेही ते म्हणाले.
कुणी एखादा नायक हा समाज बदलवत नसतो. तर प्रत्येक गाव आणि मोहल्ल्यातून नायक निर्माण करावे लगातील. संघ हा अशाच मनुष्य निर्मितीचं काम करतो. सर्व जग आज सुख आणि शांतीसाठी भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे असेही त्यांनी सांगितलं.