मुंबई पोलिसांप्रमाणेच राज्यातील पोलिसांची ड्युटीही आठ तासांची करण्यासाठी प्रयत्नशील : गृहमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ १२ तासांची असून पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी ८ तासांची ड्युटी आहे, तशीच जिल्यातील पोलिसांच्या वर्किंग ड्युटी देखील ८ तास करण्याचा सरकारचा मानस असून यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईन, असे प्रतिपादन राज्याचे नूतन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील पोलीस वसाहतीची पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरासह जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे. रविवारी पोलिस पत्नी आणि महिलांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सवांद साधत पोलीस कुटुंबियांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी समस्या ऐकून घेत लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ठाण्यात सध्या हजारो पोलिसांची कुटुंब वास्तव्य करीत असून १२ बैठ्या चाळी आणि २७ इमारती आहेत. काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतीचे पुनर्निर्माण होणे बाकी आहे. वर्तक नगर म्हाडा, जरीमरी पोलीस वसाहत जवळील इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यावर कोणताही निर्णय अध्याप झाला नसल्याने गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लक्ष वेधले आहे.
पोलिसांना घराचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम महाविकास आघाडीकडून करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल तसेच इमारतीची पुनर्बांधणी केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर असतात. पोलिसांचे राहत घर सुरक्षित असले पाहिजे हाच उद्देशसमोर ठेवून हे सरकार वसाहतीचा प्रश्न मार्गी लावेल. अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.