महाराष्ट्राचे राजकारण : सर्वोच्च न्यायालय योग्य न्याय देईल : पृथ्वीराज चव्हाण

राज्यात स्थापन करण्यात आलेले फडणवीस-पवार हे नवे सरकार बेकायदेशीर असून या सरकार एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात सत्ता स्थापनेदरम्यान घोडेबाजाराला ऊत येऊ नये यासाठी लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याचे आदेस द्यावेत, अशी आमची सुप्रीम कोर्टात मागणी केल्याचेही चव्हाण म्हणाले. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी योग्य न्याय देईल, याचा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
उद्या सुप्रीम कोर्टात आम्ही आमची बाजू मांडणार असून, अजित पवार यांनी आमदारांच्या पत्राचा अनधिकृत वापर केला असे राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीम कोर्टात सिद्ध करणार आहे. आम्हाला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे देखील आम्ही सुप्रीम कोर्टात सिद्ध करू. या प्रमाणेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनादेखील आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
फडणवीस-पवार सरकारला लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी आमची मागणी होती. मात्र, बहुमत हे विधिमंडळातच सिद्ध होईल असे कोर्टाने म्हटले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेसकडून अशी मागणी होत असताना, सरकारकडून मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत आमच्या मागणीला फाटा देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आला, असे चव्हाण म्हणाले.