थेट दिल्लीहून : पवारांच्या गुगलींनंतरही संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री सेनेचाच होणार , पवारांशी चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर…

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली . या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आहे. ती लवकरात लवकर जाऊन सरकार यावं याबाबत आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत आहे.” शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण पवारांना भेटलो, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यातले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता राष्ट्रपती राजवट असल्याने त्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणं आवश्यक आहे. सर्व पक्षीय शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घ्यावी का याविषयी चर्चा करण्यासाठी पवारांना भेटलो, असं राऊत म्हणाले.
“सरकार स्थापनेची जबाबदारी आमची नाही. ज्यांची होती, ते जबाबदारीपासून पळून गेले. पण आम्हाला खात्री आहे, आम्ही लवकरच सरकार स्थापन करू .मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनणार “, असं राऊत म्हणाले.
दरम्यान आज दिवसभरात शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाही याबाबत पवार यांनी कुठलंच थेट भाष्य करायचं टाळलं. त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे आज महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस – राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांनी दिली. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.