Politics Of Maharashtra : शरद पवार आणि रामदास आठवले यांची एकत्र पत्रकार परिषद , तो निर्णय भाजप सेनेचा…

राज्यातील सत्ता संघर्षाच्या वेळी आपला कोकण दौरा अर्धवट सोडून मुंबईत रात्री उशिरा पोहोचलेल्या शरद पवारांनी आपल्या अनुभवातून पेच प्रसंग सोडवावा अशी विनंती करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांची भेट घेऊन तशी विनंती केल्यानंतर या दोन्हीही नेत्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला . यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , ‘राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनीच समंजसपणा दाखवायला हवा.
रामदास आताहवले म्हणाले कि , ‘शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. बिघडलेलं राजकीय वातावरण दुरुस्त करण्यात पवारांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवं हा सल्ला घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली, असं आठवले यांनी या भेटीनंतर सांगितलं. शरद पवारांनीही आठवले यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. ‘आठवले यांनी एका काळजीतून माझी भेट घेतली. मात्र, जनतेनं आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला असल्यानं आमची भूमिका याबाबतीत मर्यादित आहे. तुम्हीच सेना-भाजपला समजावण्यासाठी जोमानं प्रयत्न करा, असं मी आठवलेंना सांगितल्याचं पवार म्हणाले.
आजच्या दिवसात भाजप-शिवसेनेतील वादावर तोडगा न निघाल्यास फेरनिवडणूक होऊ शकते का असं विचारलं असता ती शक्यता पवारांनी फेटाळली. ‘राज्यपाल याबाबत निर्णय घेतील. फारतर राष्ट्रपती राजवट लागू शकते. अर्थात, तो निर्णय राज्यपालांचा असेल. त्यावर मी भाष्य करू शकत नाही,’ असंही पवार म्हणाले.
भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचं असेल तर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार बनवण्यास मदत करावी, असा नवा फॉर्म्युला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांनी मांडला होता. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, ‘काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालणार आहे का,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.