राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल , तेंव्हा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : उद्धव ठाकरे

राज्याला शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल आणि बळीराजाची इच्छा असेल तर सरकार आपलंच येईल आणि या असे महत्त्वपूर्ण विधान करतानाच आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलं.
लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात खंडाळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, असे सांगितले. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यावर निश्चितच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असा सूर शेतकऱ्यांमधून लावण्यात आला. त्यावर उद्धव यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे सांगून टाकले.
सरकार स्थापन करायचं असतं तर मी मुंबईतच बसलो असतो, मात्र सरकार स्थापन करण्यापेक्षा माझ्यासाठी तुमच्यावर आलेलं संकट दूर करणं ही प्राधान्याची बाब आहे. म्हणून मी तुमच्या भेटीला आलो आहे. तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचा आहे. जे गेलं आहे ते परत मिळणार नाही. त्यामुळे या संकटातून कसा मार्ग काढता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या संकटावर मात करण्यासाठी शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देशही उद्धव यांनी यावेळी संबंधितांना दिले.