महाराष्ट्राचे राजकारण : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होईल सरकार , चंद्रकांत पाटील यांचा दावा , सेनेकडून मात्र कुठलाही प्रस्ताव नाही

राज्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी , राज्यात जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असं सांगतानाच सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं स्पष्ट केलं.
पाटील यांच्या मतानुसार राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता लवकरच सुटण्याची चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नसला तरी त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपाची दार खुली आहेत, असं पाटील म्हणाले.
दरम्यान जनतेचा स्पष्ट कौल मिळूनही महायुतीचं सरकार स्थापन करण्याबाबत भाजपा-शिवसेनेतील चर्चा बंद झाली आहे. दोन्ही पक्षातील नेते प्रसारमाध्यमातून वेगवेगळे दावे आणि परस्परांवर करत आहेत . भाजपा सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास शिवसेना सत्ता स्थापन करेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.
भाजपाचा मुख्यमंत्री होणार का? झालाच तर फडणवीसांना बाजुला करून अमित शाह यांच्या विश्वासातील चंद्रकांत दादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात येईल का? की सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेल्या नितीन गडकरींना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देताना संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी असून त्यांना एकमतानं विधीमंडळाच्या नेतेपदी निवडलं असल्याचं व त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यात स्थापन येणार असून, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी प्रस्ताव पाठवला तर भाजपा विचार करेल,” असं पाटील म्हणाले. त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनीही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असून, लवकरच गोड बातमी कळेल, असं सांगत भाजपानं सत्ता स्थापनेच्या घटनेला वेग दिला असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.