महाराष्ट्राचे राजकारण : भाजप -सेनेच्या भांडणाला पवारांची हवा, सेनेला काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी पवारांची धडपड !! सोनिया गांधींची मनधरणी करण्यासाठी दिल्ली दौरा

शेवटी स्वभावाला औषध नसते म्हणतात हेच खरे आहे , शरद पवारांचेही तसेच आहे….
राज्यातील विधानसभेचे निकाल लागून या निकालात भाजप -सेना महायुतीला सरकार स्थापनेचा स्पष्ट कौल मिळालेला आहे . मात्र अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद आणि ५०-५० च्या सूत्रावरून भाजप -सेनेत वाद निर्माण झालेले आहेत . या वादाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या लालसेने प्रारंभी आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या शरद पवारांची सेनेला सरकार बनविण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी धडपड चालली असून त्यासाठी काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा द्यावा म्हणून पवार सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सरकार स्थापनेवरून सुरु असलेली रस्सीखेच पाहता राष्ट्रवादीकडूनही सेनेला पाठिंबा देण्यासाठी वरकरणी नाही म्हणत म्हणत आतून मोर्चेबांधणी सुरू आहे. या विषयावरून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली मात्र सोनिया गांधी यांनी य नेत्यांच्या प्रस्तवाला कुठलाही प्रतिसाद न देता रिकाम्या हाताने परत पाठवले. आता याच विषयावरून सोनिया गांधी यांची मनधरणी करण्यासाठी सोमवारी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोनिया यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान सोनियांची काँग्रेस नेत्यांशी बैठक झाल्यानंतर काँग्रेसने ‘वेट अँड वॉच’चं धोरण अवलंबलेलं असल्याची माहिती या नेत्यांनी दिली होती. मात्र राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले की ४ नोव्हेंबरला दिल्लीत पवार-सोनिया भेट होत आहे. या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याबाबतच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचेही या नेत्याने सांगितले. महायुतीला बहुमत असूनही अद्याप शिवसेना-भाजपने सरकार स्थापनेसंदर्भात पावले उचललेली नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला राज्यातील सेना-भाजप वादात पडण्याची घाई दिसत नाही, मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारस्थापनेवरून सुरू असलेल्या परिस्थितीनुसार काँग्रेस निर्णय घेऊ शकते. कारण शरद पवारांच्या या कारस्थानाला काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर शिवसेनेचे बंड आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हे निव्वळ कपातील वादळ ठरणार यात वाद नाही.
‘आम्ही महाराष्ट्रातील राजकीय नाट्य पाहत आहोत. काँग्रेसने कोणताही दावा केलेला नाही. सेनेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा काँग्रेसशी चर्चाही केलेली नाही,’ असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. ‘काँग्रेस स्वत:चा वापर तडजोडीचे हत्यार म्हणून करू देणार नाही. आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे आणि आम्ही या जनादेशाचा आदर करू,’ असं काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले.