युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींना जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश : विरोधकांच्या टीकेला सरकारचे उत्तर

काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखलंय? पहाटेचे विमान पकडा आणि खुशाल काश्मीरमध्ये जा, असा टोला भाजपने विरोधकांना लगावला आहे. युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींना जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. हा कसला राष्ट्रवाद? म्हणत विरोधकांनी भाजपवर हल्ला चढवला असून भाजपनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी भाजपवर हा हल्लाबोल केला. काश्मीर जायचं असेल तर काँग्रेसवाल्यांनी सकाळची फ्लाइट पकडून खुशाल जावं. त्यांनी गुलमर्गला जावं, अनंतनागला जावं, फिरावं, पर्यटन करावं. तुम्हाला कोणी थांबवलंय? आता तर सामान्य पर्यटकांसाठीही काश्मीरचे खुले केले आहे, असं हुसैन यांनी सांगितलं. काश्मीरमधून जेव्हा कलम ३७० हटविण्यात आलं होतं, तेव्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही पावलं उचलण्यात आली होती. मात्र, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती निवळल्यानंतर सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत, अस हुसैन यांनी सांगितलं.
आमच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही. सर्व काही उघड आहे. जेव्हा काश्मीरमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे होती, तेव्हा बाबा बर्फानीच्या दर्शनावरही बंदी घालण्यात आली होती. यूरोपीय संघाच्या खासदारांना काश्मीरला जायचं होतं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परवानगी मागितली होती. सामान्य पर्यटकांसाठी काश्मीर खुले करण्यात आल्यानंतर विदेशी खासदारांना जाण्यापासून मज्जाव करणं योग्य ठरलं नसतं. युरोपीय संघाला काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी दिल्याने पाकिस्तानकडून होणारा अपप्रचारही थांबेल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींना परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेससह विरोधकांनी हल्लाबोल केला होता. ‘भाजपचा हा राष्ट्रवाद अजबच आहे,’ अशी खोचक टिप्पणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली होती. ‘काश्मीरमध्ये युरोपच्या प्रतिनिधींना फेरफटका मारण्याची आणि हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाते. मात्र, भारतीय खासदार व राजकीय नेत्यांना विमानतळावरूनच परत पाठवलं जात आहे. मोठा अजब राष्ट्रवाद आहे हा,’ असं त्यांनी म्हटलं होतं.