Man Ki Baat : नारी शक्ती , लक्ष्मीचा सन्मान करा , देशी वस्तू खरेदी करा , मोदींचे जनतेला आवाहन

देशातील जनतेने नेहमी देशी वस्तू खरेदी कराव्यात असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे केले. एखादी वस्तू गावात मिळत असेल, तर ती खरेदी करण्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज नाही, आणि एखादी वस्तू तालुक्याला मिळत असेल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यता नाही. जनतेने स्थानिक वस्तू खरेदी कराव्यात, महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त आणि आपली स्वप्ने अशा प्रकारे नक्कीचपूर्ण करू शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या दिवाळीला काहीतरी वेगळे करणार असे गेल्या वर्षी ‘मन की बात’मध्ये मी संकल्प केला होता. दिवाळीनिमित्त देशातील नारी शक्ती आणि त्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करू या, अर्थात लक्ष्मींचा सन्मान करू असा संकल्प मी केला होता, याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी ‘मनकी बात’मध्ये केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करत अयोध्या प्रकरणावरही भाष्य केले. देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पंतप्रधानांनी दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला.
पंतप्रधान मोदी आपल्या मन की बातमध्ये म्हणाले की, ‘आजकाल केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जगातील देशात दिवाळी महोत्सवात केवळ भारतीयच सहभाग घेत नसून तेथील सरकारे आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत.’
सध्या जगभरात फेस्टीव्हल टुरिझमचेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यास मोठा वाव आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी फेस्टिव्हल टुरिझमकडे सर्वांचे लक्ष वेधले. दिवाळी असो, होळी असो, ओणम असो, पोंगल असो किंवा बिहु असो, अशा सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.