पक्षांतर करणाऱ्यांना महाराष्ट्र आणि गुजरातच्या मतदारांनी शिकवला चांगलाच धडा , मोदींच्या सभा होऊनही दलबदलूंना लोकांनी नाकारले !!

महाराष्ट्र असो कि गुजरात , मोका पाहून छक्का मारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा मतदारांनी सपशेल प्रभाव केल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पुढाकार घेतला होता परंतु जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांच्या विरोधात कौल दिला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून तर हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघातून पराभव झाला. तर गोंदियामध्येही काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा पराभव झाला आहे. वैभव पिचड, भरत गावित, रमेश आडसकर या नेत्यांनाही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचाही बारामती मतदारसंघात दारुण पराभव झाला.
विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच ढोल ताशांच्या गजरात दिल्लीत जाऊन भाजपात प्रवेश केलेले साताराचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी तब्ब्ल ९५ हजारहून अधिक मतांनी उदयनराजेंचा निकाल लावत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली त्यामुळे उदयन महाराजांच्या पायाखालील वाळूही घसरून गेली. याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष त्याच्याकडे नक्की लक्ष देईल असे म्हटले असले तरी साताऱ्यातील जनाधार गेल्याने उदयनराजे हवालदिल झाले आहेत.
याशिवाय महाराष्ट्रामध्ये जे उदयनराजेंच्या बाबतीत घडलं तेच गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर आणि काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहे . याविषयीचे अधिक वृत्त असे कि , गुजरातमधील विधानसभेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले त्यात सहा पैकी तीन जागांवर भाजपाने तर तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या अल्पेश यांचा पराभव झाला आहे. अल्पेश यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. राधनपुर येथील विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अल्पेश यांचा साडेतीन हजारहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अल्पेश हे ओबीसी नेता म्हणून पुढे आले होते. त्यानंतर २०१७ साली काँग्रेसने त्यांना राधनपुरच्या जागेवरुन विधानसभेचे तिकीट दिले होते. येथून निवडून आल्यानंतर अल्पेश यांचे काँग्रेसशी अनेक गोष्टींवरुन खटके उडू लागले. अखेर त्यांनी याच वर्षी १८ जुलै रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राधनपुरच्या जागेवर पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रघुभाई देसाई यांनी अल्पेश यांचा पराभव केला. अल्पेश यांचे निकटवर्तीय आणि भाजपामध्ये प्रवेश केलेले आणखीन एक मोठे नाव म्हणजे धवलसिंह झाला यांचाही या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. बायड येथील विधानसभेच्या जागेवरुन लढणाऱ्या झाला यांचा काँग्रेसच्या जशू पटेल यांनी पराभव केला.
दरम्यान अहमदाबादमधील अमराईवाडीबरोबर लूनावाडा आणि खेरालु येथील जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. अमराईवाडीमध्ये भाजपाच्या जगदीश पटेल यांनी काँग्रेसच्या धर्मेंद्र पटेल यांचा पराभाव केला. लूनावाडामध्ये भाजपाच्या जिगेश सेवक यांनी काँग्रेसच्या गुलाब सिंह यांना हरवले. तर खेरालुमध्ये काँग्रेसच्या बाबूजी ठाकोर यांचा पराभव झाला. खेरालुच्या जनतेने भाजपाच्या अजमलसिंह ठाकोर यांच्या पारड्यात मताधिक्य दिले. तर काँग्रेसने राधनपूर आणि बायडबरोबरच थराद येथील जागेवर तब्बल १५ वर्षांनंतर विजय मिळवला आहे.