केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे केले मान्य

कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रावर ईव्हीएमचे कोणतेही बटण दाबले तरी मत कमळ या चिन्हालाच जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितले. केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली आणि तातडीनं ईव्हीएम बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसह लोकसभेच्या सातारा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचे मतदारांच्या लक्षात आले. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान दिल्यानंतरही व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत जात असल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार केली. तसेच नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. तोपर्यंत दोनशेच्या जवळपास मतदान झाले होते. सुरुवातीला गावकऱ्यांच्या तक्रारीकडे मतदान अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, आक्रमक झालेल्या ग्रामस्थांमुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काही वेळ तणावाचे वातावरण होते. हा गोंधळ सुरू असतानाच ईव्हीएममध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांकडून करण्यात आल्या. अखेर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी ईव्हीएममधील घोळाची शाहनिशा करून घेतली. खात्री पटल्यानंतर त्यांनी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे मान्य करून ईव्हीएम बदलले. त्यानंतर मतदान केंद्रावरील तणाव निवळला, अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली. या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, अशी मतदारांची मागणी आहे.