ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावण्याची काँग्रेसची निवणूक आयोगाकडे मागणी

विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधीच ईव्हीएमवर विरोधकांची नाराजी असताना आता ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यासंबंधी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्रदेखील पाठवलं आहे. यासगळ्यावर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
थोरात यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवलं. मतमोजणीच्या वेळी स्ट्रॉंगरूमच्या आसपास इंटरनेट सुविधा बंद करावी अशी मागणीही काँगसने केली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मतमोजणी केंद्राबाहेर जॅमर लावण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेदेखील निवडणूक आयोगकडे जॅमर लावण्याची मागणी केली आहे. यावर आता निवडणूक आयोग याची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
देशभरात गेल्या काही निवडणुकांपासून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही ईव्हीएमवरच घेण्यात आली. मात्र आता साताऱ्यात हा प्रकार उघडकीस आल्याने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.