भाजपा नवीन संविधान बनविण्याच्या प्रयत्नात, शरद पवारांनी पुन्हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवावा – अबू आझमी

स्थानिक पदाधिका-याची डिमांड पुर्ण केली नाही, म्हणून काँग्रेसचा असंतोष
भाजप सरकार नवीन संविधान बनविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आमची आता थेट लढाई भाजपासोबत आहे. भाजपाला संपविणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवावा. औरंगाबादच्या पुर्व विधानसभा मतदार संघाची जागा समाजवादी पार्टीलाच देण्यात आली होती. त्यावरुन आता वाद कशासाठी केला जात आहे असे मत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
समाजवादी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि जनता दल अशी महाआघाडी विधानसभा निवडणुका लढवत आहे. समाजवादी पार्टी महाराष्ट्रात ५७ जागा लढविणार होती. मात्र, आम्ही विचार करुन केवळ तीन जागांवर लढत आहोत. पुर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार कलीम कुरेशी हे भरघोस मतांनी निवडून येतील. मोदी सरकारने बेरोजगारी हटविण्याची घोषणा केली होती. पण गेल्या ४५ वर्षांपासून बेरोजगारीचा प्रश्न अजूनही अधांतरीतच आहे. औरंगाबाद हे मराठवाड्याचे केंद्रबिंदू आहे. या शहरात पिण्याचे पाणी नाही. दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न देखील नागरिकांना भेडसावत आहे. आमचा पक्ष केवळ तीन जागा लढवत असल्यामुळे आमचा रस्ता कोणीही रोखू नये. आमची लढाई आता थेट शिवसेना-भाजपाशी आहे. काही जण सेटींग करुन भाजपाशी हातमिळवणी करत आहेत. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचा त्यांना अंदाज नाही. देशभरात मुस्लिमांची संख्या १३ टक्के आहे. पण देशाला मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व नाही.
……..
दंगलग्रस्तांना अजूनही मदत नाही…..
रमजान महिन्याच्या काळात गेल्या दोन वर्षांपुर्वी औरंगाबादेत दंगल उसळली होती. त्यावेळी समाजवादी पार्टीच्या वतीने मी प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलो होतो. यावेळी दोन्ही समाजाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, त्या सामान्य जनतेला अजूनही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेशात ज्यावेळी दंगल उसळली होती. तेव्हा समाजवादी पार्टीने प्रत्येकाला १५ लाखांची मदत दिलेली आहे. जनतेने ख-याची साथ द्यावी असे आवाहन अबू आझमी यांनी केले.
…….
सतरा मिनिटात बाबरी मशिद पाडली……
भाजपा आणि शिवसेनेचे नेते आम्ही सतरा मिनिटात बाबरी मशिद पाडल्याचा कांगावा करत आहेत. या देशातील मुस्लिम वगळता सर्वच धर्मीयांना भाजपाने रेड कार्पेट अंथरले आहे. आता वीस वर्षापर्यंत भारताची आर्थिक परिस्थिती बिकट राहणार आहे. तेव्हा मतदारांनी मतांची विभागणी करु नये असेही आझमी म्हणाले.
………
पवारांनी घडवावा महाराष्ट्र….
आमची लढाई आता थेट भाजपासोबत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता मैदानात उतरले आहेत. तेव्हा त्यांनी जोमाने कामाला लागण्याची आता खरी गरज आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराष्ट्र आता शरद पवारांनी हाती सत्ता घेऊन पुन्हा घडवावा असेही मत आझमी यांनी व्यक्त केले.
…….
स्थानिक पदाधिका-याची मोठी डिमांड……
सुरूवातीला आपल्याला काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक पदाधिका-याकडे उमेदवारीसाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, या पदाधिका-याची मोठी डिमांड होती. ती आपण पुर्ण करु शकलो नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिका-याने आपल्याला समर्थन नाकारल्याचा गंभीर आरोप सपाचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केला.
…….