महाराष्ट्र विधानसभा २०१९ : कोल्हापुरात पवारांची सरकार विरोधात तोफ धडाडली

भाजप-शिवसेना महायुतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडू लागली असून कोल्हापुरात आज राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत पवारांनी भाजप व राज्य सरकारवर सडकून टीका केली.
‘शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं सध्या होताना दिसत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे अशा सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. ‘ज्या लोकांनी महाराष्ट्राला चुकीच्या रस्त्यावर नेऊन ठेवलं आहे, त्यांच्या हातातून महाराष्ट्र काढून योग्य रस्त्यावर आणून सोडणे, ही माझी जबाबदारी आहे, असेही पवार पुढे म्हणाले.
महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला. त्यामुळे या आत्महत्या झाल्या आहेत. अब्रूचा पंचनामा होत असेल तर ते स्वाभिमानी शेतकऱ्यांना सहन होत नाही मग ते आत्महत्येचा मार्ग निवडतात. असे असताना निर्ढावलेलं सरकार काहीच करताना दिसत नाही. म्हणूनच तुम्हाला आता या सरकारविरुद्ध कौल आणि निकाल द्यावा लागणार आहे, असे आवाहन पवारांनी केले.
कोल्हापूरमध्ये पुरानंतर जी विदारक स्थिती आहे, त्यावर पवारांनी बोट ठेवलं. पवार म्हणाले, कोल्हापुरात नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला हवी होती. मात्र तसं झालं नाही. मुख्यमंत्री फक्त अर्धा तास सांगलीत थांबले व पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून माघारी गेले, अशा शब्दांत पवारांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो हा बेशरमपणा आहे. त्या मुलीला न्याय तर मिळाला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली, असा संताप व्यक्त करत हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, असे पवारांनी नमूद केले.