महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मोदींच्या उपस्थितीत आज होतेय बैठक , युतीवरही अंतिम चर्चा

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबाबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज भाजप मुख्यालयात आज बैठक होत असल्याचे वृत्त आहे. या बैठकीमध्ये राज्याच्या विधानसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करून युती बाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी हे उपस्थित असणार आहेत.
दरम्यान भाजपसमोर महाराष्ट्रातील सत्ता टिकविण्याचे आव्हान असून पंतप्रधान विदेशातून परतल्यानंतर या निर्णय प्रक्रियेला गती आली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपशी यापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे. पी . नड्डा यांनी चर्चा करून आज पंतप्रधानांशी चर्चा करून भाजप आपला निर्णय जाहीर कर्ण आहे .
विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर निर्माण झालेल्या ईडी प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या प्रकरणाला शह कसा द्यायचा याचा विचार भाजप करीत आहे . विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरीही अद्याप शिवसेना-भाजप युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आज दिल्लीतील बैठकीत भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या सरकारने केंद्रात घेतलेले निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने केलेला महाराष्ट्र दौरा यामुळे राज्यात भाजपने व्हनगळीच वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता काबीज करणं भाजपसाठी सोपं असल्याचा दावा करण्यात येत होता. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं ईडी प्रकरणात नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान या प्रकरणाचे राजकीय आयुध करून ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मवाळ भूमिका न घेता शरद पवार अधिक आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे परिणामी भाजपसमोर नवं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे ईडी प्रकरणात काँग्रेस, वंचित आघाडी आणि मनसेसह भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही पवारांच्या बाजूने मैदानात उतरली. त्यामुळे भाजपची अधिकच अडचण झाली आहे. या अडचणींचा सामना भाजप कसा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.