राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या सहा विशेष याचिका, आरोपींना दिलासा नाही

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने २२ ऑगस्ट रोजी पोलिसांना दिले होते.
या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ६ विशेष याचिका सुप्रीम कोर्टाचे न्या . अरुणकुमार मिश्रा व न्या . एम.आर . शहा यांनी सोमवारी फेटाळल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास ५० नेते अडचणीत सापडले आहेत.
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला वसंतराव शिंदे ,अमरसिंह पंडित ,सिद्रामाप्पा आलुरे ,आनंदराव अडसूळ ,नीलेश सरनाईक ,रामप्रसाद बोर्डीकर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. पण त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या मतांचा परिणाम होऊ न देता तपास पूर्ण करावा अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली आहे.