पक्षांतर्गत पडझडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते त्रस्त , बाळासाहेब थोरातांच्या जिल्ह्यातील लोकसभा उमेदवार आमदारही जाणार शिवसेनेत

लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाही काँग्रेस – राष्ट्रवादीची पडझड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा फटका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही बसला आहे . काँग्रेसचे श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत ४ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश होईल.
लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे हे शिर्डी मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच पक्षाची पडझड होत असल्याने बाळासाहेब थोरात बॅकफूटवर गेले आहेत.
दरम्यान दिल्लीतील घडामोडींमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसचे आक्रमक नेते आणि महाराष्ट्र उमेदवार छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला अल्टीमेटम दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मध्य प्रदेशात भाजपला धक्का देत काँग्रेसने सत्ता मिळवली. पण त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षनेतृत्वाने अनुभवी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असणारे ज्योतिरादित्य सिंधिया पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अशातच आता ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना महाराष्ट्र विधानसभेसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यासाठी छाननी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे सिंधिया यांनी पक्ष सोडल्यास महाराष्ट्रातील काँग्रेसलाही धक्का बसू शकतो.