काश्मीर खोऱ्यात सध्या भीतीचं वातावरण, सरकारने खुलासा करण्याची ओमर अब्दुल्लाची मागणी

काश्मीर खोऱ्यात सध्या भीतीचं वातावरण आहे. काश्मीरमध्ये अचानक इतकं भीतीचं वातावरण का निर्माण झालं? हे संसदेनं सांगितलं पाहिजे. काश्मीरबाबत केंद्र सरकारची काय उपाय योजना आहे? हे सरकारने सांगितलं पाहिजे, असं सांगतानाच काश्मीरमध्ये अचानक भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने कलम ३५ ए बाबतच्या बऱ्याच शंका उपस्थित होत आहेत, असं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं.
ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव असून जनतेच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारने घाबरण्याची आवश्यकता नाही असे निवदेन जारी करावे, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे.
ज्या पद्धतीने पर्यटकांना राज्याबाहेर जाण्यास सांगण्यात येत आहे, त्यामुळे राज्यातील लोक तनावात आले आहेत. लोकांच्या मनात कलम ३५ ए वरून संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने स्वत:हून निवेदन जारी करायला हवं, असं सांगतानाच जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केल्याबद्दलही अब्दुल्ला यांनी सवाल केला आहे. शुक्रवारपासूनच काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवण्यासाठी पेट्रोल पंप आणि किराणा दुकानांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. त्यात सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना लवकरात लवकर काश्मीर सोडण्यास सांगितले. हे यापूर्वी कधी घडले नव्हते. पर्यटकांवर कधीही हल्ला झालेला नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडतंय, त्याचा आणि कलम ३५ अ किंवा ३७०चा काही संबंध आहे का? असा प्रश्न आम्ही राज्यपाल मलिक यांना विचारला त्यावर सरकारसमोर असा काही विषय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये सैन्य संख्या वाढवली असली तरी कुठलीही घोषणा करण्याची ही तयारी नाही असे राज्यपालांनी आम्हाला आश्वासन दिलंय असंही ते म्हणाले.