भाजपच्या सर्व्हे मध्ये युती केली किंवा नाही केली तरी मिळतील सर्वाधिक जागा , किती ते तुम्ही पहाच …

आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात असताना या पार्श्वभूमीवर भाजपने केलेला सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा आहे. कारण विधानसभेत स्वबळावर लढूनही भाजपला बहुमत मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्याने या सर्व्हेची माहिती दिली. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाने वृत्त प्रकाशित केलं आहे.
‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत लढल्यास युतीला २०० जागा मिळतील तर आघाडीच्या वाट्याला ८८ जागा येतील. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला १६०, शिवसेना ९० तर काँग्रेस-राष्ट्रवादी ३८ जागांपर्यंत थांबेल. तसंच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला २३० जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ ५८ जागांवर समाधान मानावं लागेल,’ अशी आकडेवारी भाजपच्या सर्वेतून समोर आल्याचं सरकारमधील एका मंत्र्यानं सांगितलं आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असं सांगत आहेत तर दुसरीकडे शिवसेनादेखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलंय, असं सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.