डोंगरी दुर्घटना हत्या असल्याचा आ. वारीस पठाण यांचा आरोप

डोंगरीत चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर एमआयएमचे आमदार वारिस पठाणयांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी धोकादायक इमारतींवर आवाज उठवत आहे. अनेकदा विधानसभेतही त्यावर आवाज उठवला. सरकारने केवळ आश्वासन दिलं, पण त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आज घडलेली घटना ही दुर्घटना नसून हत्याच आहे, असा खळबळजनक आरोप वारिस पठाण यांनी केला आहे.
केसरबाई इमारत कोसळल्याची माहिती मिळताच वारिस पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला धारेवर धरले. सरकार केवळ इमारतींना नोटीस देऊन धोकादायक घोषित करते. किंवा राहण्यास अयोग्य असलेल्या चेंबूरमध्ये या लोकांचं पुनर्वसन केलं जातं. ज्या परिसरातील इमारती धोकादायक आहेत, त्याच परिसरात नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावं, हे मी सरकारला अनेकदा सांगितलं.
नवीन इमारत बनवून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवावं हे सुद्धा अनेकदा सांगूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याा आरोप पठाण यांनी केला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास डोंगरी येथे शंभर वर्षे जुनी केसरबाई इमारत कोसळली असून या दुर्घटनेत 7 जण ठार झाले आहेत.