Good News : ऑटो रिक्षा चालकांचा बेमुदत राज्यस्तरीय संप अखेर मागे, बेस्टचे किमान भाडेही आता ५ रुपये

मुंबईसह राज्यावरील रिक्षासंपाचं संकट टळलं आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दालनात उद्या (९ जुलै) बैठक बोलावल्याने न्याय मिळेल, या अपेक्षेने आम्ही नियोजित संप मागे घेत आहोत, अशी घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली. राज्यातील जनतेची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार राज्यव्यापी संप मागे घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री आमच्या मागण्या मान्य करतील, असा विश्वास आहे. बैठकीसाठी आम्हाला पाचारण केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असेही राव यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना, रिक्षा चालकांना मेडिक्लेम आणि पेन्शन योजना तातडीने लागू करावी आणि ओला-उबर आणि अन्य बेकायदा टॅक्सी कंपन्यांची सेवा तातडीने बंद करावी यांसह एकूण आठ मागण्यांसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृति समितीने संपाची हाक दिली होती.
बेस्टचे किमान भाडे आता ५ रुपये
बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टचे किमान भाडे आता ८ वरून ५ रुपये झाले आहे. ही भाडेकपात उद्या मंगळवार ९ जुलैपासून लागू होणार आहे. भाडेकपातीच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
मागील मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत या किमान भाडेकपातीबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या भाडेकपातीला मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसेच रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर आज राज्य सरकारनेही परवानगी दिली.
महापालिकेने बेस्ट प्रशासनाला काही अटींवर ६०० कोटी रुपये अनुदान दिले होते. त्यानुसार वाढीव ५३० बस भाडेकरारावर घेऊन भाडेकपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला. तेथे हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.