अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण, दोन दिवसात ५ लाख कोटींचे नुकसान झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली असून अवघ्या दोन दिवसातच गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. शुक्रवारी बीएसईच्या यादीवरील कंपन्यांची मार्केट कॅप १५३.५८ लाख कोटी होती. सोमवारी त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून हा आकडा १४८.४३ लाख कोटीवर आला आहे. याप्रमाणे गेल्या दोन दिवसात ५ लाख कोटींपेक्षा अधिक नुकसान सोसावं लागलं आहे.
दरम्यान, आज शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ७५० अंकांनी घसरून ३८,७२०.५७ वर आला. शेअर बाजाराच्या ३० पैकी २५ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ५० पैकी ४४ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी २५२.५५ अंकाने घसरून ११,५५८.६० वर बंद झाला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर मार्केट आज चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण तसं काही न होता शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स अजून काही अंकांनी घसरला आहे. आजचा व्यापार सुरू होताच सेन्सेक्स ३७ अंकांनी तर निफ्टी ४०.२५ अंकांनी घसरला.
दरम्यान, पीएनबी बँकेत भूषण पाव अँड स्टील या कंपनीचा ३ हजार ८०० कोटी रूपयांचा घोटाळा समोर आला आहे. पीएनबीने याची माहिती रिझर्व्ह बँकेलाही दिली आहे. हा घोटाळा समोर आल्यामुळे पीएनबीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारूती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.
देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा कोणताही मास्टर प्लान या अर्थसंकल्पात नव्हता. गुंतवणूकदारांनाही दिलासा देण्याचा अर्थसंकल्पातून कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळेच गुंतवणूकदार नाराज झाले असून शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं सांगण्यात येतं.