आता रामाचं काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल, मोहन भागवत यांनी व्यक्त केला विश्वास

‘रामाचं काम करायचं आहे म्हणजेच आपलं काम करायचं आहे. आपलं काम आपण स्वत: केलं तर ठीक, दुसऱ्याकडे सोपवलं तर कोणाला तरी लक्ष ठेवावं लागतं’, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता प्रभू रामाचं काम करायचं आहे, रामाचं काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल, असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.
भागवत यांनी थेट अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला नसला तरी अयोध्येच्या अनुषंगानेच भागवत यांनी हे विधान केल्याचं राजकीय उदयपूर येथे सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. रामाचं काम करायचं आहे आणि हे काम होणारच. प्रभू रामाचं काम करणं म्हणजे आपलंच काम करण्यासारखं आहे.
आपलं काम आपण स्वत: केलं तर ते चांगलं होतं. ते दुसऱ्यांवर सोपवलं तर त्यावर लक्ष ठेवावं लागतं, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भागवतांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला हा टोला लगावला आहे. संत मोरारी बापू यांनी प्रभू रामाचं काम सर्वांना करायचं आहे, असं म्हटलं होतं. तोच धागा पकडून भागवत यांनी हे वक्तव्य केलं.
ज्या देशातील लोक सजग, चारित्र्यवान, सक्रिय आणि शक्तिशाली असतात तो देश नेहमीच प्रगतीपथावर असतो, असं इतिहास सांगतो, असं सांगतानाच भारत महाशक्ती कधी होणार? असा सवाल नेहमीच केला जातो. भारत महाशक्ती होणारच. पण भारताचं महाशक्ती होणं आणि इतर देशांचं महाशक्ती असणं यात मोठा फरक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाने राम मंदिरावरून उघड नाराजी व्यक्त केली होती. केंद्रात कुणाचंही सरकार आलं तरी लोकसभा निवडणुकीनंतर संघ राम मंदिराचं बांधकाम सुरू करेल, असा दावा संघाच्या एका नेत्याने केला होता. त्यामुळे भागवत यांनी केलेल्या या वक्तव्याला अधिक महत्त्व आलं आहे.