Loksabha 2019 : पाचव्या टप्प्यात, सात राज्यात ५१ जागांवर ६२.५६ टक्के मतदान

काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सात राज्यांतील ५१ जागांवर आज शांततेत मतदान पार पडलं. या सातही राज्यात एकूण ६२.५६ टक्के मतदान झालं असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७४.६ टक्के तर उत्तर प्रदेशात ५७.३३ टक्के आणि बिहारमध्ये ५६.७९ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. आज झालेल्या मतदानामुळे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी आदींचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. पाचव्या टप्प्यातील ५१ मतदारसंघांपैकी ३८ मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत.
पाचव्या टप्प्यात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. आतापर्यंत एकूण ४२४ जागांसाठी मतदान झाल्याचं निवडणूक उपायुक्त डॉ. सक्सेना यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिकांमध्ये हाणामारी झाली. अनंतनागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ टक्के मतदान झालं. लडाखमध्येही हिंसक घटना घडल्या. मात्र या ठिकाणी ५२ टक्के मतदान पार पडलं. बिहारमध्ये मात्र शांततापूर्वक मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यांतील ५१ जागांसाठी एकूण ६७४ उमदेवार निवडणूक रिंगणात होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांत आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये सर्वात कमी ३७.३७ टक्के मतदान झालं तर होशंगाबादमध्ये सर्वाधिक ६८.३८ टक्के मतदान झालं आहे. ६ वाजल्यानंतरही मध्यप्रदेशातील सातही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे काँग्रेसचे उमेदवार पवन काजल यांनी आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.