प्रचार संपला : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे सोमवारी मतदान , १७ जागांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार अखेर आज सायंकाळी सहा वाजता समाप्त झाला . चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यात देशातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात एकूण ९ राज्यांमध्ये मतदान होईल. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी या १७ मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), उर्मिला मातोंडकर (उत्तर मुंबई), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), मिलींद देवरा (दक्षिण मुंबई), अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे यांच्या लढतीकडे लक्ष लागलेले आहे .
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यात तब्बल ३.११ कोटी मतदार मतदानास पात्र असणार आहेत. या मतदानाबरोबरच ३२३ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.
चौथ्या टप्प्यात ज्या जागांवर निवडणूक होत आहे त्या सर्व मतदारसंघांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व आहे. २०१४च्या निवडणुकीत या १७ जागांपैकी ८ जागा भाजपने तर ९ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशनंतर (८० जागा) लोकसभेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी पाठवणारं महाराष्ट्र (४८ जागा) हे दुसरं राज्य असून सोमवारी होणाऱ्या मतदानानंतर राज्यातील लोकसभेची रणधुमाळी थंडावणार आहे. राज्यात याआधी ११, १८ आणि २३ एप्रिल असे मतदानाचे तीन टप्पे पार पडले.