लोकसभा २०१९ :शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, राष्ट्रवादीचा वादा

शेतकरी, ग्रामविकास, शिक्षण आणि रोजगार निर्मितीवर भर देणारा जाहीरनामा आज राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सोयीसुविधा आणि रोजगार निर्मितीतून ग्रामीण भागातील गरीबी दूर करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीने दिलं आहे. तसंच कमी पाऊस पडणाऱ्या भागात शेतीसाठी ‘सिटू मॉइश्चर’ पद्धती, जलसंवर्धन आणि सिंचनाची क्षमता वाढवणं आणि पाण्याचा सुयोग्य वापर करून उत्पादन वाढवण्याकरता नव्या शेती पद्धती निर्माण करण्यासाठी विशेष योजना राबवल्या जातील. तसंच अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
राष्ट्रवादीने अल्पसंख्याक समाजासाठीही काही योजना जाहीर केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी छोट्या, मोठ्या शहरांमध्ये वसतिगृह उभारणार, अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे यासाठी दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींच्या कुटुंबीयांना विशेष लाभ देणार, असल्याचं राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात म्हटलं आहे.