loksabha 2019 : महाआघाडीचे ठरले !! काँग्रेस-राष्ट्रवादीचे २४-२० सूत्र उर्वरित ४ जागा मित्र पक्षांना…

अखेर पक्षीय कार्यकर्त्यांच्या अडचणींचा सामना करीत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी भाजपाला आव्हान सज्ज झाली असल्याचे संकेत आज जाहीरपणे देत महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार असून बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे. महाआघाडीच्या जागावाटपावर यामुळे आता शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र या पत्रकार परिषदेला गैरहजर होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये महाआघाडीचं जागावाटप जाहीर करण्यात आलं.
पत्रकार परिषदेत बोलताना यावेळी त्यांनी भाजपावर आणि विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेना हे धर्मांध पक्ष आहेत त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय रहणार नाहीत असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजपा आणि इतर पक्षांकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जातं आहे असाही आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्या जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिक पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट हे सगळे पक्ष महाआघाडीत सहभागी झाले आहेत.