बालकोटमधील आपल्या तळावर फायटर विमानांनी हल्ला केला : मौलाना अम्मारची कबुली
पाकिस्तानातील बालकोटमधील आपल्या तळावर इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हल्ला केल्याचे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मारने मान्य केले आहे. सीएनएन न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. त्यांच्या हाती एका ऑडिओ क्लिप लागली आहे. त्यामध्ये मौलान अम्मार भारताच्या फायटर विमानांनी पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआयच्या तळांवर बॉम्बफेक केली नाही पण बालकोटमधील जैशच्या तळावर हल्ला केल्याचे सांगत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना त्याने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली.भारताच्या विमानांनी एजन्सीचे मुख्यालय किंवा जिथे अधिकाऱ्यांच्या बैठका होतात तिथे हल्ला केला नाही. जिथे मुलांना जिहाद शिकवला जातो त्या केंद्रावर बॉम्बफेक केली असे अम्मारने सांगितले. आयएसआयसाठी काम करणारे कर्नल सलीम कारी आणि जैशचा ट्रेनर मौलाना मोईन बालकोटच्या हवाई हल्ल्यात ठार झाले असे न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. भारताने मंगळवारी पहाटे खैबर पख्तूनखवा प्रांतातील बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला होता . या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले. पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवली. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. १४ फेब्रुवारीला हल्ला झाला. त्यानंतर भारताने बालकोटमध्ये हे एअर स्ट्राइक केले होते .