Air Strike : पाककडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; भारताचेही चोख प्रत्युत्तर

काल पहाटेच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील ‘जैश’चे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर नियंत्रण रेषेवर स्फोटक स्थिती निर्माण झाली असून बिथरलेल्या पाक सैन्याने नियंत्रण रेषा परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला आहे. भारताकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या अखनूर केरी भागात पाक सैन्याने हल्ला आणि गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेजवर भारताचे पाच जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. दोन्हीकडून गोळीबार केला जातो आहे. राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला. कृष्णा घाटी भागातही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळच्या कृष्णा घाटी परिसरात सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला.
दरम्यान भारताने बालाकोटमध्ये ज्या दहशतवादी तळांवर हल्ला केला तिथे आंतरराष्ट्रीय वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना आज नेण्यात येणार होते. मात्र, पाकिस्तानने खराब हवामानाचे कारण देऊन आजचा दौरा उद्यावर ढकलला. घटनास्थळाहून दहशतवाद्यांचे मृतदेह हटवण्यासाठी तसेच पाकच्या अडचणीचे ठरणारे अन्य पुरावे नष्ट करण्यासाठीच हा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.