कंटेनरवर कार धडकल्याने चारजण ठार
टायर फुटल्याने अचानक रस्त्यावर आडवा झालेल्या कंटेनरवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले. नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापुर तालुक्यातील भग्गाव शिवारात हा अपघात सोमवारी मध्यरात्री घडला. अपघातात विलास पंढरीनाथ घुले (वय ४२) व त्यांची पत्नी सविता विलास घुले (वय ३८) (दोघेही रा. रामनगर, औरंगाबाद), दिनेश बाजीराव बकाल (वय ४०), मदन रघुजी ढाकणे (वय ४५) (दोघे रा. चिकलठाणा, औरंगाबाद) जागीच ठार झाले आहेत. मीरा मदन ढाकणे (वय ४०) या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे सर्वजण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले होते. सोमवारी रात्री औरंगाबादला परतत असताना वैजापूरजवळ अचानक कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर रोडवर आडवा झाला होता. यावेळी समोरून येणारी कार कंटेनरवर येऊन आदळली. यात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या एका अपघातात महिला ठार
कामावर जाण्यासाठी कंपनीच्या बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभा असलेल्या एका महिलेस भरधाव ट्रॅक्टरने आज सकाळी ६. १५ वाजेच्या दरम्यान चिरडले. मीरा विद्यानंद इलग असे मृत महिलेचे नाव असून बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरासमोर ही घटना घडली.
बजाजनगर येथे राहणाऱ्या मीरा विद्यानंद इलग (27, रा. पास्टा, पो. शेवली जि. जालना ह.मु. बजाजनागर) या परिसरातील एका कंपनीत कामावर आहेत. आज सकाळीं ६ वाजेच्या दरम्यान त्या नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी जाण्यास घरून निघाल्या. मोहटादेवी मंदिरासमोर कंपनीच्या बसच्या थांब्यावर त्या उभा होत्या. याच दरम्यान एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने ( क्र. MH- 20, CY- 117 ) त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.