Dhamaka: जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त, ३०० ठार : वायुसेनेच्या धमाका

भारतीय हवाई दलाने १२ मिराज २००० या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने हाय अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासूनच सीमेवर लढाऊ विमानांचा आवाज येत होता अशी माहिती सीमेवरील स्थानिक भारतीय नागरिकांनीही दिली आहे.
डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री राजनाथ सिंग आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर भारतीय हवाई दलाने पहिल्यांच सीमेपलिकडे जात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हवाई दलाने दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुजफ्फराबादमार्गे पाकिस्तानात प्रवेश करत हवाई दलाने ‘जैश-ए-मोहम्मद’चे ‘अल्फा-३’ हे कंट्रोल रूम उद्ध्वस्त करून टाकले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात बालाकोट आणि चकोटीमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी सांगितले की, कारगिल युद्धात मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानी घुसखोरांना सळो की पळो करून सोडले होते. यावेळी देखील हवाई दलाने मिराज २००० विमानांचा वापर करत पूर्ण तयारीनिशी हा हल्ला केला.
पाकिस्तानने देखील या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत भारताने नियंत्रण रेषा पार केल्याचा आरोप केला आहे.