Arunachal Pradesh : आंदोलनाला हिंसक वळण , इटानगरमध्ये संचारबंदी
अरुणाचल प्रदेशमध्ये संतप्त जमावाने उपमुख्यमंत्री चाव मेन यांचा बंगला जाळल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने लष्कराला पाचारण केले असून इटानगरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, उप मुख्यमंत्री चाव मेन यांना नामसाई जिल्ह्यात हलविले असून तिथे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ६ आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाण पत्र देण्याच्या प्रस्तावाविरोधात अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. शनिवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलक आणखी संतापले व त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्रीपासून या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून सरकारने लष्करी जवानांना तैनात केले आहे. इटानगरच्या बहुतांश परिसरात हिंसा झाल्याची माहिती असून पोलिसांनी आतापर्यंत २१ आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही समजतंय. या परिसरात आंदोलकांनी जवळपास ५० गाड्या जाळल्या व १०० गाड्यांचे नुकसान केल्याची माहिती आहे. या घटनेवर बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पोलिसांच्या गोळीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला असून ‘पोलिसांच्या गोळीबारात निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दंगलीत अनेकजण जखमी झाले आहेत.