लोकसभा जागा वाटपात आम्हाला डावलणे ही अवहेलना व अन्याय : रामदास आठवले

बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही
राज्यात भाजप-शिवसेना युतीने लोकसभा जागा वाटपात ‘रिपाइं’ला डावलले, ही धक्कादायक बाब आहे. आम्ही नाराज आहोत. स्वतंत्र निवडून येऊ शकत नसलो, तरी पाडू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबादेत बोलताना सांगितले. भाजपचा आम्ही सन्मान करतो त्यांनी ‘रिपाइं’ विचार करावा. एक जागा मागितली, त्यातही डावलणे म्हणजे ही अवहेलना व अन्याय असल्याचेही ते म्हणाले.
आठवले पुढे म्हणाले आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकत्याबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. युतीची घोषणा करताना भाजप आणि शिवसेनेने दोघातील जागा वाटप जाहीर केले. मात्र यात रिपाईला विश्वासात घेतले नाहीच शिवाय एकही जागा सोडली नाही. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा करून आमच्यासाठी एक जागा सोडावी अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले पुढे म्हणाले कि , भाजपच्या नेत्यांना भेटून दक्षिण मध्य मुंबईची एक जागा ‘रिपाइं’साठी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. असे असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह राज्यात येतात, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन युती जाहीर करतात . त्यात ‘रिपाइं’ला डावलले गेले, हे मनाला खटकणारे आहे. आम्ही काही त्यांना अडचणीत आणले नाही. मात्र, आमच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात सहा महिन्यात स्थान देण्याचे मान्य केले होते. ते सहा महिने उलटून गेले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. २०१९ मध्ये त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. राफेलबाबत राहूल गांधी गैरसमज पसरवत आहेत, हे सांगायला मात्र आठवले विसरले नाहीत .