भारताचा पराभव : न्यूझीलंड विजयी

भारताचा पराभव : न्यूझीलंड 80 धावांनी विजयी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 220 धावांचं आव्हान पार करताना भारताचा डाव पुन्हा कोलमडला. 19.2 षटकात भारतीय संघ फक्त 139 धावांपर्यंत मजल मारु शकला. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज आज अपयशी ठरले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अखेरीस 80 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.
त्याआधी, सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय काहीसा फसला. मुनरो आणि सिफर्ट या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्लाबोल चढवला. न्यूझीलंड धावांचा डोंगर उभा करणार असं वाटत असतानाच कृणाल पांड्याने कॉलिन मुनरोला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.
मुनरो माघारी परतल्यानंतरही सिफर्टने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. या खेळीदरम्यान त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. कर्णधार विल्यमसनच्या साथीने सिफर्टने 43 चेंडूत 84 धावा पटकावल्या. खलिल अहमदने सिफर्टचा अडसर दूर केल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी धावसंख्येत आपापल्यापरीने भर घातली. अखेर 20 षटकात न्यूझीलंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 219 धावांपर्यंत मजल मारली.
भारताच्या सर्व गोलंदाजांना आजच्या सामन्यात यश मिळालं. मात्र न्यूझीलंडच्या धावगतीवर नियंत्रण ठेवणं त्यांना जमलं नाही. हार्दिक पांड्याने 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.