MaharashtraEducationUpdate : यंदा एप्रिलमध्ये सुट्या नाहीत , रविवारीही शाळा सुरु ठेवण्यास परवानगी …
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थितीसह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याने यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना मात्र मुकावं लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
थोडक्यात मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवडयात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही . त्यात शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. संपूर्ण एप्रिल महिना हा शाळा अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे.