PandharpurNewsUpdate : भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी

मुंबई : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे अधिकृतपणे उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. भगीरथ भारत भालके हे पंढरपूर मतदारसंघातून नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. शरद पवार हे तासगाव पॅटर्न प्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याचेही ऐकायला मिळत होते. मात्र येथे उमेदवारी घोषित करताना कार्यकर्त्यांच्या मताचा अधिक विचार करण्यात आल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार पाहून उमेदवार द्यायचा, अशी भाजपची रणनीती होती. मात्र, राष्ट्रवादीने कालपर्यंत आपला उमेदवार जाहीर न केल्याने भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अवताडे यांनी यापूर्वी याच मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळेला त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर दिली आहे. ही जमेची बाजू गृहित धरत समाधान अवताडे यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे राहिले होते. आता हे आव्हान परतावून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याविषयी प्रचंड उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भगीरथ भारत भालकेंना उमेदवारी देत भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले आहे.