वंचितच्या बंद पासून ते राज ठाकरे , भीमा कोरेगाव आणि शरद पवरांच्या सुरक्षा यंत्रणेवर काय बोलले रामदास आठवले ?
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे कि , वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणं वगळता ९९.९९ ठिकाणी बंद नव्हता. या ठिकाणी जनजीवन सुरळीत सुरू होतं. बंदमध्ये माझ्या पक्षाचा सहभाग नव्हता. त्यामुळेच बंद अयशस्वी ठरला आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदवर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी कोरेगाव-भीमा हिंसेनंतर बंद पुकारला होता. त्यात माझ्या पक्षाने ताकदीने सहभाग घेतला होता. त्यामुळे हा बंद यशस्वी झाला होता. वंचितच्या आजच्या बंदला आमचा पाठिंबा नव्हता. आम्ही या बंदमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळेच वंचितचा बंद अयशस्वी ठरल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही आठवले यांनी भाष्य केले असून याबद्दल बोलताना आठवले यांनी म्हटले आहे कि , राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचंच नुकसान होणार आहे. मनसेची भूमिका शिवसेनेची कोंडी करणारी आहे. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेला शिवसेनेची मतं मिळू शकतात. मात्र राज यांना या नव्या भूमिकेनंतर किती यश मिळतं हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेलेल्या शिवसेनेला कोणताही निर्णय घेताना दोन्ही काँग्रेससोबत झुकावं लागत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना-भाजप-रिपाइं सरकार बनवू शकते, असंही ते म्हणाले. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव हिंसा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करून म्हटले आहे कि , पुणे पोलिसांनी तपासाचं काम चांगलं केलं आहे. पण काही अधिकाऱ्यांवर आक्षेप आहेत. कुणावर अन्याय झाला असं वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी चौकशी करावी, असं ते म्हणाले. शरद पवार यांच्या सुरक्षेवर भाष्य करताना ते म्हणाले कि , सुरक्षा कुणीही काढलेली नसल्याचं सांगतानाच कुणाची सुरक्षा काढायची आणि कुणाची नाही यावर अधिकारी चर्चा करतात. मुद्दाम कुणाचीही सुरक्षा काढली जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.