जेएनयू मधील हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचीही संतप्त प्रतिक्रिया , २६/ ११ ची आठवण करून देणारा हल्ला
काल मध्यरात्री दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यावर देशभर तीव्र पडसाद उमटत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली तीव्र प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्यामुळे २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची घणाघाती टीका ठाकरे यांनी केली असून या हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही, महारष्ट्रातील विद्यार्थी मात्र सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठजेएनयू इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनने केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप आहे. जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे. या हल्ला प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली. हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
दिल्लीतील जेएनयूतील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तोंड लपवून हल्ला करणारे हे घाबरट आहेत. हल्ल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी सांगितले. तोंड लपवून हल्ला करणाऱ्यांचे चेहरे उघडे झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील तरूण-विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा शब्दातही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. जेएनयू सारखा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न कोणी महाराष्ट्रात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. राज्यातील विद्यापीठांमध्ये आवश्यकता असल्यास सुरक्षिता वाढवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जेएनयू हल्ल्यानंतर विद्यार्थी युवक शांततेत आपला विरोध दर्शवत असून त्यांच्या मनातील रागाला वाट काढून देत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.