महाराष्ट्राचे सत्ताकारण : बैठकांचे सत्र चालूच , पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयायाधीच नेत्यांकडून सत्ता स्थापनेच्या घोषणा, संभाव्य मंत्र्यांची याद्याही तयार
राज्यातील सत्ता स्थापनेच्या बैठकांचा जोर असून पक्षश्रेष्ठींनी अद्याप कुठलाही निर्णय जाहीर केला नसला तरी सरावंच पक्षातील दुय्यम दर्जाच्या नेत्यांनी राज्यात शिवसेना -काँग्रेस -राष्ट्रवादीचे सरकार येणार असल्याच्या बातम्या देण्यास आधीपासूनच सुरुवात केली असून संभाव्य मंत्रिमंडळाची यादीही माध्यमांपर्यंत पोहोचवली आहे.
खरे तर काल प्रेसशी बोलताना काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असे सांगताना शिवसेनेचे नावही घेतले नव्हते हे उल्लेखनीय. काल रात्री उशिरापर्यंत काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक चालूच होती . दरम्यान बैठक संपायच्या आत आणि कुठलाही निर्णय येण्याच्या आताच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पारध्यांची ऑर्डर गेल्याचेही सांगितले होते पण अंतिम निर्णय काही आलाच नाही . आता ते १ डिसेंबरच्या आत सरकार बनेल असे सांगत आहेत आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल या मतावर ते ठाम आहेत.
नवी दिल्लीत आज सकाळपासूनच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर एकसुत्री कार्यक्रम मांडण्यात आला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खरगे, सी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक सुरु आहे. या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसला तरी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचे वृत्त आहे.
मंत्री मंडळाची संभाव्य यादीही तयार
दरम्यान न्यूज १८ लोकमतने तर संभाव्य मंत्रिमंडळाची यादीही हाती लागल्याचे वृत्त दिले असून या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, राजेश टोपे यांच्यासह इतर नावांचा विचार केला जात आहे तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील, सुनिल केदार आणि इतर नावांवर विचार चालू आहे.