Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : राज्यसभेतील शिवसेनेच्या बैठकीत झाला बदल , सत्ताधारी बाकावरून बसणार विरोधी बाकावर, एनडीएतुन बाहेर पडण्याची केवळ औपचारिकताच बाकी : संजय राऊत

Spread the love

एक तर भाजप बरोबर काडीमोड घेऊन शिवसेनेचे काहीच सध्या होताना दिसत नाही आणि दुसरीकडे एन दि ए मधून शिवसेना आपसूकच बाहेर पडल्याने त्यांना संसदेत सततधारी बाकावरून विरोधी पक्षांच्या बाकावर बसावे लागणार आहे . हे लक्षात घेऊनच , भाजपप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेनेने फारकत घेतली आहे. केंद्रातल्या एकमेव मंत्रिपदाचाही शिवसेनेकडून राजीनामा देण्यात आला आहे. पण एनडीएतून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान सोमवरो संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असून या  पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एनडीएतील सर्व घटकपक्षांना याचं निमंत्रण आहे, पण शिवसेनेला याचं निमंत्रण मिळालेलं नाही. याचा अर्थ शिवसेनेने फारकत घेत असल्याची घोषणा करण्या अगोदरच भाजपने शिवसेनेला एनडीएतुन दूर केल्याचं चित्र केंद्रात दिसत आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहात शिवसेना आता विरोधी बाकावर दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार आणि गटनेते विनायक राऊत यांनीही याबाबत माहिती दिली. ‘शिवसेनेला एनडीएच्या बैठकीला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला जाणार आहोत, आम्ही बाहेर पडण्याबाबत अजून कुठेही जाहीर केलेलं नाही. राज्यसभेतील आमच्या खासदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केल्याचंही कानावर आलं आहे. भाजपला ही दुर्बुद्धी सुचली असेल तरीही आम्हाला त्याचा फरक पडणार नाही,’ असं ते म्हणाले.

‘लोकसभेत आमच्या बसण्याची जागा आज तरी तिच आहे, भविष्यात काय होईल ते पाहून घेऊ’, असंही विनायक राऊत म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असली तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अजून त्यांचा अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. शिवाय भाजपकडूनही सरकार आमच्याशिवाय कुणी बनवणार नाही, असा दावा केला जातोय. यावर संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. भाजपकडून राष्ट्रपती राजवटीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवाय किमान समान कार्यक्रमावर महाराष्ट्रातच एकमत होत असल्यामुळे याबाबत दिल्लीत कोणतीही बैठक होणार नाही, असं ते म्हणाले.

‘सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत अशी भूमिका त्यांनी (भाजप) राज्यपालांना सांगितली, म्हणजेच त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. आता हेच नेते राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने चिंता वाटायला लागली आहे. तुम्ही काही विचित्र गोष्टी घडवू इच्छिता का? बहुमत असतं तर सत्ता स्थापन का केली नाही? राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरच का?’, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. परंतु या सर्व प्रश्नांना भाजप वाटाण्याच्या अक्षत लावणार हेच खरे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!