ऊसाचे पैसे न मिळाल्याने हतबल आणि संतप्त शेतकऱ्यांनी मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनाची परवानगी
सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला उस देऊन सहा महिने लोटले तरीही अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. लातूरमधील औसा तालुक्यातील ५० ते ६० शेतकऱ्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केलीआहे. सोलापूरच्या कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला ऊस दिला होता.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एफआरपी कायद्यानुसार नुसार आता पर्यंत त्यांचे पैसे मिळणे अपेक्षित होते मात्र वारंवार मागणी केल्यानंतही शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले नाहीत. या शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह शेतीवर असून उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. वेळेवर पैसे न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. याच उद्विग्नतेतून अखेरीस हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना अकरा प्रश्न केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आधी या उत्तरे द्यावीत, अन्यथा महाजनादेश यात्रेच्या मार्गावरूनच जनआक्रोश यात्रा काढून याचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.