धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CJP-सरकार चर्चा यशस्वी; आंदोलकांवरील FIR मागे घेण्यास सरकारची तयारी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी CJP प्रतिनिधीमंडळासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (FIR) मागे घेण्याची पक्षाची दुसरी प्रमुख मागणी सरकारने मान्य केली आहे.
“दिल्लीपुरतेच नव्हे, तर भाजपशासित आणि भाजपच्या सहयोगी राज्यांमध्ये आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व FIR मागे घेतले जातील. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच भविष्यात कोणत्याही आंदोलकावर, CJP टीमवर किंवा आंदोलनाच्या आयोजकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याबाबतही सरकारशी सहमती झाली आहे,” असे सौरव दास यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, CJP ने सरकारला लेखी हमीचा मसुदा (Draft Guarantee) दिला असून, मंगळवारपर्यंत सरकारकडून त्यावर लेखी उत्तर मिळेल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
सौरव दास यांनी आणखी माहिती देताना सांगितले की, दिल्लीसह विविध राज्यांमध्ये आंदोलकांविरोधात दाखल झालेल्या सर्व FIR ची प्रत सरकार तीन ते चार दिवसांत उपलब्ध करून देणार आहे. त्यांच्या माहितीनुसार, दिल्लीतच 15 ते 20 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व FIR मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असेही सरकारने आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या या चर्चेमुळे आंदोलनातील अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता मंगळवारी सरकारकडून मिळणाऱ्या लेखी हमीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
