IndiaNewsUpdate : मोदी सरकार गरिबांसाठी आणखी चार वर्षे मोफत रेशन देणार , मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील गरीब जनतेला मोफत धान्य वितरणाची मुदत 4 वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुढील चार वर्षापर्यंत गरिबांना मोफत धान्य मिळत राहील. या बैठकीत इतर अनेक योजनांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.
केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव म्हणाले की, मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा आहे. गरिबांना मोफत तांदळाचा पुरवठा केल्यास अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होईल.
सर्वसामान्यांचे आरोग्य लक्षात घेऊन मोदी सरकारने पोषण सुरक्षा आणि ॲनिमिया मुक्त भारत मोहिमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ॲनिमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोदी मंत्रिमंडळाने मोठा पुढाकार घेतला आहे. या मोहिमेवर 17,082 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अशक्तपणा दूर करण्यासाठी पुरवठा साखळीचे जाळे मजबूत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, देशातील गरजूंपर्यंत तांदूळ पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित केली जाईल. 21 हजार तांदूळ कारखान्यांनी 223 एलएमटी फोर्टिफाइड राईसची मासिक क्षमता असलेले ब्लेंडर बसवले आहेत. फोर्टिफाइड तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी 52 लॅब तयार करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
याशिवाय, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या भागात 2,280 किमीचे रस्ते बांधले जातील, ज्यासाठी 4,406 कोटी रुपये खर्च केला जाईल. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करणे आणि जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल तयार करणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.