Narendra Modi : मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये : प्रकाश आंबेडकर

सुप्रिया सुळेंचा पराभव होणार नाही
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आंबेडकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केले.
आंबेडकर म्हणाले, निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच देवेगौडांसारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. या निवडणुकीत राज्याबाबत काय निकाल लागतील हे सट्टा बाजारालाही सांगता येईना तर मी काय सांगणार. या निवडणुकीत मान्यता प्राप्त पार्टी होऊ इतक्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुष्काळावर बोलताना ते म्हणाले की, मागील ५० वर्षात लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत. मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असल्याप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करीत नाही. खरं म्हणजे हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार असल्याचे सांगत शरद पवार आणि सत्ताधारी भाजपावर त्यांनी निशाणा साधला.
बारामतीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल असे मला वाटत नाही. माझ्या मते सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही.