CongressNewsUpdate : दिग्विजय सिंह यांच्या माघारीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयाचा मार्ग सुकर
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आज आपण या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव गांधी परिवाराने पाठिंबा दर्शविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा माध्यमांनी सुरु केली आहे . जेंव्हा कि , पक्षाचे अधिकृत प्रवक्ते केसी वेणुगोपाल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे कि , या निवडणुकीच्या बाबतीत गांधी परिवाराची भूमिका निःपक्ष राहील.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ७५ वर्षीय दिग्विजय सिंह म्हणाले कि , “खर्गे जी माझे नेते आहेत ते ज्येष्ठ आहेत. मी काल त्यांना विचारले की त्यांना निवडणूक लढवायची आहे का? त्यांनी नाही म्हटले. मी आज त्यांना पुन्हा भेटलो. मी त्यांना सांगितले की तुम्ही निवडणूक लढवत असाल तर मी पूर्णपणे तुझ्या सोबत आहे. तुमच्या विरोधात जाण्याचा मी विचारही करू शकत नाही. आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे या दोन ज्येष्ठ नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
… आणि गेहलोत यांनी निवडणुकीतून माघार घेतली
विशेष म्हणजे या पदाच्या शर्यतीत सामील होण्यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नव्हती. गांधी घराण्याने त्यांच्या निवडीचा निर्णय घेईपर्यंत त्यांची भूमिका डमी उमेदवाराची होती हे दिग्विजय यांना चांगलेच ठाऊक होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यांचा प्रारंभी पाठिंबा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बाजूने होता, परंतु जेव्हा गेहलोत यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल तेंव्हा त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले.
सध्या काँग्रेसचे तरुण नेते सचिन पायलट मुख्यमंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत, जेव्हा पक्षाने २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा पायलट यांना वचन दिले होते की , ते आणि गेहलोत ठराविक कालावधीने या पदावर विराजमान होतील. त्यानुसार गेहलोत दिल्लीत ‘स्थलांतरित’ झाले असते, तर राजस्थान सरकारचे प्रमुख म्हणून गांधी कुटुंबाकडे पक्षाच्या पायलटच्या रूपात एक विश्वासू सहकारी मिळाला असता. खरे तर एका बाणाने दोन शिकार केल्यासारखे हे धोरण होते. मात्र, ताज्या घडामोडींनंतर गेहलोत यांनी दिल्लीच्या राजकारणातून स्वतःला अलग केले आहे.
खर्गे यांच्या उमेदवारीनंतर दिग्विजय यांनी घेतली माघार…
विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी सांगितले होते की ते पक्षप्रमुखपदासाठी निवडणूक लढवतील आणि शुक्रवारी उमेदवारी दाखल करतील. त्यासाठी त्यांनी १० उमेदवारी अर्जही घेतले होते. मध्य प्रदेश काँग्रेसचे १२ आमदारही त्यांचे प्रस्तावक होण्यास तयार होते, पण आज नामांकनाच्या शेवटच्या दिवशी दिग्विजय यांनी ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीनंतर निवडणूक लढविण्यास नकार दिला.
खर्गे यांची निवड जवळपास निश्चित…
गेहलोत म्हणाले की, “नैतिक जबाबदारी” घेऊन राजस्थानमधील काँग्रेस आमदारांच्या “अनुशासनात्मकतेबद्दल” माफी मागितली आहे आणि अध्यक्ष पदासाठी ते निवडणूक लढवणार नाही. तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधीच घेतील. “माझ्यासाठी पदे महत्त्वाची नाहीत. हायकमांड जो निर्णय घेईल, मी तेच करेन.” जवळपास ५० वर्षे आपण विविध पदांवर कार्यरत असून, ते आता आपल्यासाठी महत्त्वाचे राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अध्यक्षपदासाठी खर्गे यांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.