IndiaNewsUpdate : भाजपने गेल्या सहा महिन्यात बदलले पाच मुख्यमंत्री , काँग्रेसची #CM_नहीं_PM_बदलोची मोहीम…

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह गेल्या सहा महिन्यांत भाजपाने पाच मुख्यमंत्री बदडल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्या त्या राज्यातील लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने हे मुख्यमंत्री बदलले असल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.
याशिवाय आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. तर आता गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री म्हणून आज घोषित केले आहे. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पुन्हा एकदा पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेले आहे.
BJP has failed, on all fronts, in all states.
BJP has failed all of India.And changing Chief Ministers will not hide the Prime Minister's failures.#CM_नहीं_PM_बदलो pic.twitter.com/eRjojRo7RR
— Congress (@INCIndia) September 12, 2021
काँग्रेसची भाजपवर टीका , सुरु केली ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलोची मोहीम
दरम्यान भाजपाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याने काँग्रेसने या वरुन केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यावरून काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवले आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
तसेच आपल्या लोकांचे आधी लसीकरण करुन घेऊन करोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उफाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?, असे काँग्रेसने अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचे आकडेवारीतून दाखवण्यात आले आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र असल्याचेही काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.