CoronaNewsUpdate : आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३० सप्टेंबपर्यंत स्थगित तर महाराष्ट्रात पुन्हा रात्रीच्या संचारबंदीचे संकेत

नवी दिल्ली : दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असतानाच अमेरिकेसह जगातील अनेक देशात होत असलेला कोरोनाचा फैलाव लक्षात घेता, भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणांवर असलेली स्थगिती ३० सप्टेंबपर्यंत वाढवली आहे. तथापि, परिस्थितीनुसार सक्षम अधिकारी निवडक मार्गावर नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला परवानगी देऊ शकतात, असे विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) रविवारी स्पष्ट केले आहे .
कोरोनामुळे भारतात नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा २३ मार्च २०२० पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत मे २०२० पासून आणि निवडक देशांसोबतच्या द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्थेंतर्गत जुलै २०२० पासून विशेष आंतरराष्ट्रीय सेवा सुरू आहेत.
राज्यात रात्रीची संचारबंदी?
दरम्यान राज्यातील सक्रिय रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग असलेल्या काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. देशात केरळपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात असून, जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली आहे.
शिक्षकांचे लसीकरण
याशिवाय राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण ५ सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी येथे सांगितले. करोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांतील शाळा सुरू करता येतील का, याबाबत कृतिदल विचार करत आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.