वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लोकसभा लढविण्याची प्रियांका गांधी यांची इच्छा…

वाराणसीतून मी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवू का असा सवाल काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना रायबरेली येथे झालेल्या एका बैठकीत विचारला आहे. त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून या प्रश्नामुळे उत्तर प्रदेशात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.यंदा पहिल्यांदाच प्रियांका गांधी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा त्यांनी केली. या यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत तर सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतील. प्रियांका गांधींनी यंदा निवडणूक लढवावी अशी कुजबुज उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खेम्यातून ऐकू येते आहे. अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांना प्रियांका गांधींकडे पाहिल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण येते. तसंच जनसामान्यांमध्ये प्रियांका गांधी यांची प्रतिमा चांगली आहे. तेव्हा प्रियांका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवावी अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये जोर धरते आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे.
२०१४मध्ये आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी इथून मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. प्रियांका गांधींनी जर वाराणसीतून निवडणूक लढवल्यास मोदी वाराणसी मतदारसंघातच अडकतील आणि त्यांना इतर ठिकाणी प्रचारासाठी जास्त जाता येणार नाही. तसंच गांधी इतके तगडे आव्हान मोदींना कोणीच देऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवरच पक्षाच्या बैठकीत हा प्रश्न प्रियांका गांधींनी विचारला होता.
प्रियांका गांधींनी निवडणूक लढवावी अशी मागणी जरी सातत्याने होत असली तरी प्रियांका यांना मात्र निवडणुकीच्या राजकारणात अडकण्याची इच्छा नाही. मला पक्ष संघटनावरच लक्ष केंद्रित करण्याची जास्त इच्छा आहे असं प्रियांका गांधींनी स्पष्ट केलं आहे.